
खासदार म्हणून सांगतो, चंद्रकांत खैरेंना आमच्या पक्षात प्रवेश नाहीच, शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; मराठवाड्यातील राजकारण तापणार?
महाराष्ट्र : शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या शिवसेनेत प्रवेशास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी खैरे यांना "गद्दार" म्हणत त्यांच्यावर टीका केली. भुमरे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनतंर राज्यातील सत्ताधारी आणि
विरोधी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे गेल्या काही
दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी हे शिंदे गटात प्रवेश कर आहेत. त्यातच
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे देखील शिंदे गटात
जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. चंद्रकांत खैरे यांनी काल शिवसेना ठाकरे गटाच्या
मेळाव्याला दांडी मारली. त्यातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी चंद्रकांत
खैरेंना ऑफर दिली होती. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता
शिंदे गटातील नेत्याने चंद्रकांत खैरेंबद्दल भाष्य केले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी नुकतंच पत्रकारांशी
संवाद साधला. यावेळी त्यांना चंद्रकांत खैरेंच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल
विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. तसेच यावेळी संदिपान भुमरे यांनी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली.
खासदार संदिपान भुमरे आणि माजी खासदार
चंद्रकांत खैरे यांच्यात राजकीय संघर्ष दिसून येत आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी
चंद्रकांत खैरेंवरुन निशाणा साधला. “चंद्रकांत खैरे स्वतःला निष्ठावान आणि
आम्हाला गद्दार म्हणतात, तर त्यांनी आमच्याकडे कशाला यावे? त्यांनी आता घरी बसावे. खासदार म्हणून मी सांगतो की त्यांना आमच्या
पक्षात प्रवेश नाही,” असे संदिपान भुमरे म्हणाले.
“…त्यांना
आमच्या पक्षात प्रवेश नाही”
“चंद्रकांत खैरेंसाठी शिवसेनेचे दार बंद आहे. कारण चंद्रकांत खैरे
सांगतात की मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत. मग तुम्ही आमच्याकडे कशाला येता
तुम्ही आहात तिथेच राहा. अनेक वर्ष तुम्ही पद भूषवलीत, आता तुम्ही घरी राहावे. मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या
पक्षात प्रवेश नाही. पालकमंत्री काय म्हटले ते मला माहित नाही”, असेही संदिपान भुमरेंनी स्पष्ट केले.
“आम्हाला कुणाचीही गरज नाही”
संदिपान भुमरे यांनी अंबादास दानवे
यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “अंबादास दानवे हे केवळ कागदोपत्री नेते
आहेत. त्यांनी गेल्या सहा वर्षात काय काम केले, हे त्यांनी सांगावे,” असे संदिपान भुमरे म्हणाले. “आता सर्व निवडणुका झालेल्या आहेत आणि
आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. त्यामुळे आता आम्हाला कुणाचीही गरज नाही.” असेही संदिपान भुमरे म्हणाले. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या
वक्तव्यामुळे औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. आगामी काळात
यावर आणखी काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
0 Response to "खासदार म्हणून सांगतो, चंद्रकांत खैरेंना आमच्या पक्षात प्रवेश नाहीच, शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; मराठवाड्यातील राजकारण तापणार?"
टिप्पणी पोस्ट करा