.webp)
मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट...
महाराष्ट्र : मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात भीम जन्मोत्सवाचा जल्लोष
साजरा केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वरळी ते वांद्रे
सागरी सेतूवर लेझर लायटिंग करण्यात आले आहे. तसेच काही ठिकाणी फटाक्यांची आतेषबाजी, मिरवणुकांचेही आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. आता नुकतंच मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन
करत पोस्ट शेअर केली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही पोस्ट शेअर
केली आहे. यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याला बाबासाहेबांनी दिलेला
पाठिंबा याबद्दल भाष्य केले आहे. तसेच आपण मराठी म्हणून एकत्र येणं कसं गरजेचे आहे, याबद्दलही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट
“भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची
आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला
बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह
संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी
कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं आवश्यक आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि
या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस
बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या
पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे
मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या
बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे.
स्वतः बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी
धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं
निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं
विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A
Linguistic Province मध्ये वाचता येईल. हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की
बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत
फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ
शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं.
ते म्हणाले होते की मुसलमानांनी
भारतावर-हिंदूंवर आक्रमणं केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही.
मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत
नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार
नाही. पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या
लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र
आंदोलकांवर होणाऱ्या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी
देसाईंना जेरीस आणलं होतं. पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा
प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचं योगदान हे विसरता
येणार नाही.
आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून
एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव
प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या
युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम !” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मुंबईत
सागरी सेतूवर रोषणाई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची
१३४ वी जयंती पार पडत आहे. या निमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूच्यामध्ये लेझर
लायटिंग करण्यात आली आहे. या सागरी सेतूवर एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांचा
फोटो तर दुसऱ्या बाजूला अशोक चक्र आणि संविधान यांची प्रतिकृती विद्युत रोषणाईद्वारे
करण्यात आली आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीमध्येही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई
करण्यात आली आहे.
0 Response to "मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर… डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट... "
टिप्पणी पोस्ट करा