
आक्रोश आणि मातम… अख्खी रात्र डोळ्याला डोळा नाही, तिघे अजूनही बेपत्ता, जळगाव अपघातात रात्रीपासून पहाटेपर्यंत काय काय घडलं?
महाराष्ट्र,जळगाव : पाचोऱ्याजवळ झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे घाबरलेले प्रवासी उडी मारल्याने दुसऱ्या रेल्वेने त्यांना धडक दिली. मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि नेपाळचे नागरिक आहेत. काही जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या
दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग लागल्याची अपवा पसरली. ती ऐकून
घाबरलेल्या काही प्रवाशांनी एक्स्प्रेसमधून खाली उडी मारली आणि समोरून दुसऱ्या
ट्रॅकवरून आलेल्या एका रेल्वेने त्या प्रवाशांना उडवलं. त्यामध्ये एकूण 13 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून 12 हून अधिक जखमी आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
आहेत. जळगाव जिल्हा रुग्णालयात सध्या मृतकांचे नातेवाईक जमण्यास सुरुवात झाली आहे.
मृतांमध्ये 3 जण उत्तर प्रदेशचे तर चौघे हे नेपाळचे
असल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान या अपघातानंतर काही जण बेपत्ता असल्याची माहिती समोर
आली आहे. रेल्वे अपघातातील घटनेमध्ये नेपाळ येथील विश्वकर्मा कुटुंबातील तिघेजण
बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. नंदराम विश्वकर्मा , मैसरा विश्वकर्मा आणि हेमू विश्वकर्मा अशी तिघांची नावे आहेत. हे संपूर्ण
कुटुंब नेपाळ वरून लखनऊला आलं , त्यानंतर ते लखनऊ येथून मुंबईकडे येत
होतं. यात सोबतचे इतर परिवारातील सदस्य हे सुखरूप आहेत मात्र नंदराम विश्वकर्मा
त्यांची पत्नी मैसरा विश्वकर्मा व दहा वर्षाची चिमुकली हेमू विश्वकर्मा हे
बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. पहाटे पाच वाजेपासून
तिघांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा रुग्णालयात आलेले आहेत. मात्र प्रशासनाचे
कुठलेही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी नसल्याने बेपत्ता व्यक्तींबाबत कुठलीही माहिती
मिळत शकत नाहीये. तिघांचा शोध घ्यावा, त्यांच्या बाबत काही तरी माहिती द्यावी
अशी माहिती मयत नंदराम यांचा मोठा भाऊ विक्रम विश्वकर्मा यांनी बोलताना दिली आहे.
नेपाळ येथील कमला नवीन भंडारी यांचाही
मृत्यू
कमला भंडारी या त्याच्या सासऱ्याचा
नेपाळमध्ये मृत्यू झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. तेथून पुन्हा
मुंबई येथे घराकडे परतत असताना दुर्दैवी अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मुंबईतून कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र
भंडारी हा जळगावचे जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. आम्ही मूळचे नेपाळचे असल्याने
आता मृतदेह कधी ताब्यात मिळणार, कसे ताब्यात मिळणार,मृतदेह घेऊन पोहोचायचं कसं असे अनेक प्रश्न मयत कमला भंडारी यांचा
मुलगा तसेच सुनबाई यांना पडले आहेत. आईच्या मृत्यूचे, वियोगाचे दु:ख ताजे असतानाच आता त्यांचा मृतदेह घरी कसा न्यायचा हा
सध्या त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. कमला भंडारी यांचा मृतदेह घेऊन जाणे
संदर्भात प्रशासनाकडून कुठल्याही सूचना मिळालेल्या नाहीत, त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात लवकरात लवकर
सूचना स्पष्टीकरण द्यावं अशी त्यांची मागणी आहे.
अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत
जळगावजवळ झालेल्या दुर्घटनेनंतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील
पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय
वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे ट्विट त्यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील
मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य
सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार
करेल.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही त्यांनी नमूद केलं.
असा झाला अपघात
ही ट्रेन परांडा रेल्वे स्थानकाजवळ येत
होती. तितक्यात पुष्पक एक्सप्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्सप्रेसच्या
चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये एक्सप्रेसला आग
लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे बायका मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
एक्सप्रेसमधील लोक हादरून गेले. आवाज आणि किंचाळ्या सुरू झाल्या. प्रवाशी या
प्रकाराने चांगलेच हादरून गेले होते. त्यामुळे 35 ते 40 प्रवाशांनी एक्सप्रेसमधून पटापट उड्या
मारल्या. समोरून गाडी येते की नाही याची खातरजमाही त्यांनी केली नाही. तेवढ्यात
समोरून बंगळुरू एक्सप्रेस आल्याने बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलं. त्यात आत्तापर्यंत
13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी आहेत.
0 Response to "आक्रोश आणि मातम… अख्खी रात्र डोळ्याला डोळा नाही, तिघे अजूनही बेपत्ता, जळगाव अपघातात रात्रीपासून पहाटेपर्यंत काय काय घडलं?"
टिप्पणी पोस्ट करा