
राज्यातील या भागांत पावसाचे संकट, तापमानाबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्र : भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.
राज्यात पुन्हा पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान
विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानच्या पूर्व
भागात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे विदर्भातून केरळपर्यंत
हवेची कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील चार दिवस
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. हवेच्या दाबाची ही रेषा विदर्भातून जात आहे.
बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत
आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तापमान वाढीमुळे उंच ढगांची निर्मिती होत आहे.
यामुळे पुढील चार दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
तापमानात चढ-उतार होणार
सध्या राजस्थानच्या पूर्व भागावर
वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून पूर्व
विदर्भात आज आणि उद्या हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे. बदललेल्या
वातावरणामुळे आज आणि उद्या पूर्व विदर्भातील तापमानात थोडी घट होणार आहे. हवामान
विभागाने लोकांना बदलत्या हवामानाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले
आहे. या पावसानंतर राज्यात पुन्हा उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भात अनेक ठिकाणी अवकाळी
भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने
वर्तविलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
गुरुवारी संध्याकाळी आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु
झाला. हा पाऊस धान शेतीसाठी फायदेशीर असला तरी मका, बागायती शेतीसाठी नुकसानकारक आहे.
गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी झाली. या
पावसामुळे धाण, मका, भाजीपाला आणि इतर पिकांना फटका बसला
आहे. अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा
बसला. अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्यात पाणी टंचाई जाणवणार नाही
राज्यातील धरणांत 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध आहे. यामुळे राज्यात पाणी
टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सध्या उन्हाची तीव्रता पाहता मे महिन्यात पाऊस
पडेल अशी शक्यता आहे. तरीही 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
राज्यातील धरणात आहे.
0 Response to "राज्यातील या भागांत पावसाचे संकट, तापमानाबाबत हवामान विभागाचा अंदाज काय?"
टिप्पणी पोस्ट करा