.webp)
कळलं, मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या – संजय राऊत...
महाराष्ट्र : "त्यांच्या हातात अडीच वर्षात सरकार होतं. दोन याचिकांचा निचरा करता आला असता, तेव्हा चंद्रचूड होते, तेव्हा त्यांना सहज शक्य होतं. त्यांना हवा तो निकाल घेता आला असता. आता बहुतेक त्यांना हवा तो निकाल घेता येत नाही. त्यामुळे त्यांचा या याचिका प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न आहे" असं संजय राऊत म्हणाले.
“गिरीश महाजन यांचं मानसिक स्वास्थ का
बिघडलं ते माहीत आहे, ते अनेक खटलेबाजीत अडकून
पडले आहेत. त्यामुळे त्यांना माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी देशात शिवजयंतीची सुट्टी
जाहीर करावी अशी मागणी केली आहे. कळलं, मिस्टर महाजन जरा ऐकून
घ्या. कानातील बोळे काढा आणि ऐका. उद्धव ठाकरेंनी देशात सुट्टी जाहीर करण्याची
मागणी केली आहे. महाराष्ट्रात सुट्टी आहेच. देशात हवी. अशी मागणी आहे” असं संजय राऊत म्हणाले. “का मागणी केली? एसंशि गटाचे प्रमुख अमित शाह रायगडावर आले. त्यांनी शिवाजी
महाराजांवर प्रवचन दिलं. त्यातील अर्ध्या गोष्टी खोट्या. शिवाजी महाराजांचा उल्लेख
एकेरी केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला. हे यांचं शिवरायांचं प्रेम.
तुम्ही खरोखर शिवभक्त असाल तर देशात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करा. एवढंच त्यांनी
सांगितलं. गिरीश महाजन यांना ऐकायला कमी येतं का. कमी येतं का? आमचा आरोग्य खात्याशी चांगला संबंध आहे. आम्ही त्यांना डॉक्टर
देऊ” अशा शब्दात संजय राऊत यांनी समाचार घेतला.
“शिवरायांचा पुतळा मालवणच्या समुद्रावर
उभा राहतोय, तर त्याचं स्वागत आहे. छत्रपतींनी जलदुर्ग उभे केले. नवीन शौर्याचं
प्रतिक उभं केलं. पण पहिला पुतळा का पडला? त्याचे गुन्हेगार बाहेर का? पुतळ्यात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला. स्थानिक राजकारण्यांच्या
घरापर्यंत गेला. तो पैसा निवडणुकीत वापरला. त्या गद्दारांवर काय कारवाई झाली.
त्यावर त्यांनी पुतळा उभारण्यापूर्वी उत्तर द्यावं” असं संजय राऊत म्हणाले.
‘मुंबईचं गुजरातीकरण करायचं आहे’
मांसाहाराबद्दल संजय राऊत भरभरुन बोलले. “आम्ही या संदर्भात एसंशि पक्षाचे नेते अमित शाह यांच्याकडे तक्रार
करू. संघाचे भैय्याजी जोशी यांनी घाटकोपरला जाऊन घाटकोपर गुजरात्याचं सांगितलं
होतं. त्यामुळे हे काय आहे. कसं आहे. त्यांना कसा इंगा दाखवायचा. पण आम्ही नक्कीच
अमित शाह, नरेंद्र मोदी यांना कळवू. कारण त्यांना मुंबईचं गुजरातीकरण करायचं
आहे. त्याला भाजपसह इतर पक्षांचं मूक समर्थन आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.
‘न्याय देवता आंधळीच असली पाहिजे’
“चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली असली, तरी न्याय देवता आंधळीच असली पाहिजे. तिने इकडे तिकडे पाहू नये.
आपल्यासमोर कोण आहे. त्या पद्धतीनेच न्याय करावा. भूषण गवई यांना साडे सहा
महिन्याचा कार्यकाळ मिळतोय. तो कमी असला तरी देशाच्या न्याय व्यवस्थेत परिवर्तन
घडवायला भरपूर वेळ आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. विदर्भाचे सुपुत्र आहेत.
त्यामुळे नक्कीच देशातील शोषित, पददलित समाज आहे, लोकशाही मानणारा जो समाज आहे त्याचं गवईंवर विशेष लक्ष असणार आहे” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
0 Response to "कळलं, मिस्टर महाजन जरा ऐकून घ्या – संजय राऊत... "
टिप्पणी पोस्ट करा