
महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू...
महाराष्ट्र : बुलढाणा जिल्ह्यात ११ वर्षीय संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर आणि मालेगाव येथे ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संस्कार
सोनटक्के या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने
मृत्यू झाला आहे. शेगाव च्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो शिक्षण घेत होता.
यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संस्कार सोनटक्के हा बुलढाणा
जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता. तो इयत्ता
सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर
त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा
दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी
विद्यार्थ्यांना बसला आहे
चंद्रपुरात तापमानाचा पारा वाढला
चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानाचा पारा
मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चंद्रपुरात ४०.६ अंश सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचले
आहे. वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी चंद्रपूर शहरातील वाहतूक सिग्नल
दुपारी १ ते ४ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालेगावात
उष्णतेचा कहर
मालेगाव शहर आणि तालुक्यातही उष्णतेची
लाट पसरली आहे. मालेगावातील तापमानाने ४३.२ अंशांचा आकडा पार केला आहे. हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही आठवडे अधिक उष्णता जाणवणार
असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना
उष्माघाताचा त्रास झाल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी मालेगाव सामान्य
रुग्णालयात १० खाटांचा उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठी ५ आणि
मोठ्यांसाठी आयसीयूमध्ये ५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातही उष्माघात कक्ष सज्ज
धुळे जिल्ह्यातही तापमानात वाढ होत
असल्यामुळे जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात
सध्या चार बेड उपलब्ध आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक
औषधसाठा देखील पुरेसा ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची
तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
0 Response to "महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू... "
टिप्पणी पोस्ट करा