उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही, त्यांना जनतेनं जागा दाखवली, एकच.. शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला...
महाराष्ट्र : शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पवार कुटुंबातील अंतर्गत वाद आणि दिवाळी साजरे करण्यातील फूट यावरही त्यांनी भाष्य केले. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बेधडक
वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणातून ते अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे
सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. शरद पवार मोदींवर टीका करतात, पण त्यांनी आयुष्यभर काय केलं ? पक्ष फोडलेच. अनेकांना
फोडलं, जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं असा आरोप राज ठाकरे हे
पवारांवर सातत्याने करताना दिसतात. त्यावर आज शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर
देत राज ठाकरेंनाच सुनावलं. ” मी राज्यात जातीयवादी
राजकारण केल्याचं एक उदाहरण तरी मला कोणी दाखवावं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही
केलंच नाही, वक्तव्य केली, टीका टिप्पणी केली त्यांच्या विधानावर काय भाष्य करायचं ?. दुर्लक्ष करायचं. महाराष्ट्रातली जनता शहाणी आहे. त्यांनी
त्यांना ( राज ठाकरे) एकच जागा दिली संपूर्ण महाराष्ट्रात.” अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.
बारामतीमध्ये एकत्र जमून दिवाळी साजरी करायची ही पवार कुटुंबियांची
परंपरा.. मात्र या वर्षी ही परंपरा खंडित झाली. यंदा बारामतीमध्ये दोन पाडवे साजरे
झाले. शरद पवार यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांनी गोविंदबाहेत गर्दी केली होती. तर
अजित पवार यांनी काटेवाडीमध्ये पाडवा साजरा केला. पहिल्यांदाच असं घडल्यामुळे आपण
अस्वस्थ असल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी
पवार कुटुंबातील वादावर प्रतिक्रिया दिली. तसेच राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार
घेत त्यांना प्रत्युत्तरही दिलं.
सरकारने
जबाबदारी पाळली नाही
पोलीस महासंचलाक रश्मी शुक्ला यांच्यावरून सध्या सुरू असलेला वाद
जगजाहीर आहे. त्याबद्दलही शरद पवार स्पष्ट बोलले. माझं स्वत:चं जे करिअर आहे ते
गृहखात्याचा राज्यमंत्री म्हणून झालं. त्यानंतर गृहमंत्री होतो. चारवेळा
मुख्यमंत्री असताना गृहखातं माझ्याकडे आहे. मला गृहखात्याची चांगली माहिती आहे.
चांगले कर्तबगार अधिकारी गृहखात्यात होते. राज्यात पहिल्यांदाच पोलीस
महासंचालकाबाबत जाहीरपणाने लोक आणि राजकीय पक्ष मागण्या करत आहेत. ही स्थिती कधीच
आली नव्हती. त्या व्यक्तीबाबत बोललं जातं. त्यांनी काय काय उद्योग केले, फोन टॅपिंग झाली त्याची चर्चा झाली. खरंतर चौकशी करून त्यातील सत्य
काढण्याची सरकारची जबाबदारी होती. पण सरकारने जबाबदारी पाळली नाही. उलट त्यांना
एक्स्टेन्शन दिलं. याचा अर्थ या यंत्रणा कशा वागतात एक वेगळी नीती राज्य सरकारने
ठरवलेली दिसती. त्याचा हा परिणाम आहे, असं शरद पवार म्हणाले.
पंतप्रधानांनी
महाराष्ट्राचा धसका घेतलाय
आगामी विधानसभा निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीकडून प्रचाराचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपने मेगा प्लान आखला असून राज्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ यांसारखे अनेक मोठे चेहरे जाहीर सभा घेणार आहेत.
महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या 10 सभा होणार आहेत. त्याविषयीही शरद पवार
बोलले. ‘ पंतप्रधानांच्या राज्यात इतक्या सभा होणार आहेत, त्याअर्थी त्यांनी महाराष्ट्राचा धसका घेतला आहे. पंतप्रधान 8 ठिकाणी येतात की 16 ठिकाणी. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या
16 की 12 सभा आहेत’,असं पवार म्हणाले
फडणवीसांची
सुरक्षा वाढवली
सरकारला वाटत असेल तर काळजी घेतली
पाहिजे. पण जो गृहमंत्री आहे, त्यांना (आधीच) सुरक्षा आहे. आणि तरीही
सुरक्षा दिली जाते याचा अर्थ तो विषय गंभीर आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार
नाही. त्यांना जी सुरक्षा देण्यात आली. तीच मला देण्यात येणार होती. पण मी नकार दिला, असं पवारांनी नमूद केलं.
0 Response to "उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही, त्यांना जनतेनं जागा दाखवली, एकच.. शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला... "
टिप्पणी पोस्ट करा