“मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या, तानाजी सावंतांना बडतर्फ करा”, ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी...
महाराष्ट्र,मुंबई: आतापर्यंत 40 कोटी रुपये या ठेकेदारांना मिळाले, पण रुग्णवाहिका आल्या नाहीत. या सर्व कंपन्या नक्की कोणाच्या व हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे? असा सवालही त्यांनी केला.
Saamana Rokthok Sanjay Raut : महाराष्ट्रातील आरोग्य खाते भ्रष्टाचाराने पोखरले
आहे. आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने गिळले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात
मेंदुज्वराने तडफडणाऱ्या मुलांचे प्राण कोण वाचवणार? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत
यांनी केला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ताबडतोब बडतर्फ करावे
आणि सदोष मनुष्यवधाचा खटला भरावा, अशी मागणीही ठाकरे गटाने यावेळी केली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून राज्य
सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची
मदत सुरू केली. आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या बहिणी व
गायींच्या संवर्धनासाठी वळवला. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्थेचे स्मशान
झाले, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
सामनाच्या रोखठोक सदरात काय?
“सकाळी 11 वाजता मलबार हिलच्या ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर जे घडले ते चित्र
महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. तापाने (मेंदुज्वर) फणफणलेल्या मुलांना घेऊन
असंख्य ‘माता’ सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पोहोचल्या.
त्या मुलांना सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर रस्त्यावर ठेवून ‘माता’ आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. ‘सह्याद्री’त देशाचे गृहमंत्री अमित शहा व
मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राजकीय बैठक सुरू होती व त्या मातांना
मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. कारण तापाने फणफणलेल्या मुलांना ‘लस’ मिळत नाही. सरकार मुलांच्या आरोग्याच्या
बाबतीत हेळसांड करीत आहे. मुले तडफडत आहेत. त्यांचे प्राण वाचवा, असे सांगण्यासाठी ‘माता’ सह्याद्रीवर पोहोचल्या, पण त्यांना पायरीवरच रोखले गेले. “मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय.
विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत
नाहीत. त्यांना लस मिळत नाही,” अशी वेदना ‘सहय़ाद्री’च्या बाहेर एका मातेने मांडली. ती वेदना
अस्वस्थ करणारी आहे. निवडणूक कार्यात गुंतलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांना या
वेदनेची दखल घ्यावी असे वाटले नाही. मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या
वाटल्या”, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
“आता सरकारने गायींना राज्यमातांचा दर्जा
दिला. गायी जगवण्यासाठी निधी मंजूर केला. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे
रुपयांची मदत सुरू केली. आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या
बहिणी व गायींच्या संवर्धनासाठी वळवला. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्थेचे
स्मशान झाले व तापाने फणफणलेल्या मुलांना घेऊन माता-भगिनी ‘सह्याद्री’च्या बाहेर उभ्या ठाकल्या. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांकडे
सरकारने लक्ष दिले नाही. कारण सरकार भ्रष्टाचारात व राजकारणात गुंतून पडले आहे. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांचे आंदोलन
हे महाराष्ट्रातील माणुसकीचे अधःपतन आणि दारिद्र्याचे दृश्य आहे. मुलांना औषध व लस
मिळत नाही. काही मुलांचे मृत्यू त्यात झाले व हे लोक गायींना वाचविण्यासाठी पैसे
खर्च करीत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ताबडतोब बडतर्फ
करावे व सदोष मनुष्यवधाचा खटला भरावा असा कारभार राज्याच्या आरोग्य खात्यात सुरू
आहे”, अशी मागणी संजय राऊतांनी केली.
“एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा नाही”
“आरोग्य खात्यात डॉक्टर, नर्सच्या बदल्या-बढत्या व नेमणुकांत
भ्रष्टाचार आहे. सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नेमणुका
करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात व ते पैसे वसूल करण्यासाठी लहान मुलांना
तापाने फणफणून तडफडत मरावे लागते. आरोग्य खात्यातील ‘लुटी’चे नवेच प्रकरण आता समोर आले.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी अनेकांचे मृत्यू झाले.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रुग्णवाहिका नाहीत. पण रुग्णवाहिकांच्या नावावर
गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपये आरोग्य खात्याने लुटले. मर्जीतील ठेकेदारांचे
खिसे भरण्यासाठी चौपट दरवाढीने 12 हजार कोटींचे रुग्णवाहिका टेंडर ‘सुमित पासिलिटीज’ व स्पेनच्या एलएसजी या कंपन्यांना दिले.
बी.डी.जी. कंपनीही त्यात आहे. पण या कंपन्यांनी आतापर्यंत एकाही रुग्णवाहिकेचा
पुरवठा केला नाही. आतापर्यंत 40 कोटी रुपये या ठेकेदारांना मिळाले, पण रुग्णवाहिका आल्या नाहीत. या सर्व कंपन्या नक्की कोणाच्या व हा
पैसा कोणाच्या खिशात जात आहे?” असा सवालही त्यांनी केला.
“आरोग्य खात्यातील या ठेकेदारीने अनेकांना प्राणास मुकावे लागले.
कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य
खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही? लहान मुलांवर तापाचे उपचारही होत नाहीत.
मुलांना घेऊन माता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मलबार हिलवर पोहोचतात तेव्हा अमित
शहांबरोबर राजकीय बैठकीत गुंतलेले मुख्यमंत्री त्या मातांना भेटत नाहीत. गायींना
निधी, पण तापाने फणफणलेल्या मुलांना औषधे व लस नाही. कारण आरोग्य खात्याचे 3190 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आरोग्य मंत्र्यांच्या कंपनीत
गेले. महाराष्ट्रात गरीबांची थट्टा सुरू आहे. ती सध्या तरी थांबेल असे दिसत नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
0 Response to "“मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या, तानाजी सावंतांना बडतर्फ करा”, ठाकरे गटाच्या खासदाराची मागणी... "
टिप्पणी पोस्ट करा