मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीही महाविकास आघाडीच्या वाटेवर; संजय शिरसाट यांचं मोठं विधान काय?
महाराष्ट्र: महाविकास आघाडीने निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जात आहेत आणि मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. यावेळी त्यांनी नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या वादावरही भाष्य केलं.
विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर
करू, अशी घोषणा महाविकास आघाडीने आधीच केली आहे. तर, आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद नाही असं म्हणणाऱ्या
महायुतीनेही आता महाविकास आघाडीच्या मार्गाने जायचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं
आहे. आमच्यात मुख्यमंत्रीपदाची कोणतीही चर्चा नाही. निवडणुकीनंतरच आम्ही
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेऊ, असं खुद्द शिंदे गटाचे नेते
संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी
मिळणार का? महायुतीचा निवडणुकीनंतरचा
मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय असेल? यावर अनेक तर्कवितर्क लढवले
जात आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना ही
प्रतिक्रिया व्यक्त केली. महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या नावाची चर्चा नाही. पण आमचं
एक गणित ठरलं आहे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणुका
लढवायच्या आहेत हे ठरलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणूक झाल्यावर होणार आहे.
कोण मुख्यमंत्री हे आमच्यासमोर नाही. त्याची चर्चा सुद्धा आमच्या पक्षात किंवा
महायुतीत होत नाही, असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.
प्रत्येकाला वाटतं…
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असं
अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. त्याकडे संजय शिरसाट यांचं लक्ष वेधण्यात आलं.
त्यावर, ते अब्दुल सत्तार यांचं मत आहे. पण प्रवक्ता म्हणून असा कोणताही
निर्णय झाला नाही. प्रत्येक पक्षाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. मलाही
वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत. पण आम्ही निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा
निर्णय घेऊ, असं संजय शिरसाट म्हणाले.
युती फायनल
आमची युती फायनल झालीय. त्याची आज उद्या
घोषणा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कामाख्या देवीला
जाणं गैर नाही. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने आम्ही केलेला उठाव यशस्वी झाला.
काही लोकं आमचं पोस्टमार्टम करायला तयार होते. त्यांना कामाख्या देवीचा जो शाप
लागला आहे, त्यातून ते आताही बाहेर निघाले नाही. त्यामुळे आशीर्वाद घेणं हे
आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. मुख्यमंत्री कामाख्या देवीकडे जाणार असेल तर चांगली
बाब आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
नामुष्की आली
महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत आणि
नाना पटोले यांच्यातील वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्यामुळे इतर
पक्ष चालत आहे असं उबाठा गटाला वाटायचं. त्यांना काँग्रेसने चांगली चपराक दिली
आहे. माईक खेचण्यापर्यंत प्रकार गेला आहे. शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेल्या
संघटनेच्या नेत्यांची अवस्था काल महाराष्ट्राने पाहिली आहे. यांच्याबरोबर युती करू
नका, असं आम्ही सांगायचो. यांच्याबरोबर युती केल्याने काय परिणाम होतात, तुमच्या तोंडावर तुमच्या पीसीत तुम्हाला कसं सुनावलं जातं, तरीही आपलं तुटेपर्यंत ताणू नका असं सांगणं ही या पक्षावर नामुष्की
आली आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
ही तर उबाठाला चपराक
नाना पटोले काय तक्रार करतात. नाना
पटोले हे पक्षाच्या शिस्तीत चालणारे आहेत. त्यामुळे त्यांनी राऊतांना खडेबोल
सुनावले आहेत. आम्हाला निर्णय घेताना पक्ष श्रेष्ठींना विचारावं लागतं, हे पक्षाचे प्रमुख असलेल्या भूमिकेतून बोलत असेल तर ती उबाठाला
दिलेली चपराक आहे. राऊत यांनी काहीही केलं तरी नाना ऐकणार नाहीत. शरद पवार
यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मध्यस्थी करावी लागते त्यावरून आघाडीत किती अनबन
आहे हे स्पष्ट झालं आहे, असा दावाही त्यांनी केला.
0 Response to "मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीही महाविकास आघाडीच्या वाटेवर; संजय शिरसाट यांचं मोठं विधान काय?"
टिप्पणी पोस्ट करा