
बॉलिवूडशी कनेक्शन असलेल्या वांद्र्याची आज ही अवस्था, कुठे नेऊन ठेवलाय वांद्रे आमचा?
महाराष्ट्र,मुंबई : मुंबईतील वांद्रे इथल्या निवासस्थानी अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीने चाकूहल्ला केला. या घटनेनंतर वांद्रे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात वांद्यात तीन हाय प्रोफाइल गुन्हे झाले आहेत. यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट पाहुयात..
अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात झालेल्या
चाकूहल्ल्याच्या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुरुवारी (16 जानेवारी) मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने एक कोटी रुपयांची खंडणी
मागत केलेल्या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला. हा हल्लेखोर अकराव्या मजल्यावरील
शौचालयाच्या खिडकीतून सैफच्या घरात शिरला होता. त्याने सैफवर सहा वार केले आणि
त्यानंतर तो पळून गेला. मुंबई पोलिसांची दहा पथकं त्याचा शोध घेत आहेत. या
हल्ल्यात सैफसह त्याच्या घरातील दोन महिला कर्मचारीही जखमी झाल्या आहेत. या
घटनेनंतर एकंदरीत बॉलिवूड सेलिब्रिटींची सुरक्षा आणि मुंबईतील वांद्रे परिसरात सतत
व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींवर होणारे हल्ले हा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी मंत्री
आणि अनेक सेलिब्रिटींसोबत जवळचा संबंध ठेवणारे बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला
गोळीबार, अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार आणि आता त्यानंतर
सैफच्या घरात झालेला हल्ला.. अशा घटनांमुळे उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या वांद्रे (Bandra) परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
वांद्रे परिसरात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. सैफवरील झालेल्या
हल्ल्यानंतर कलाविश्वातील अनेकांनी तिथल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.
वर्षभरात वांद्र्यात तीन हाय-प्रोफाइल
गुन्हे; गोळीबार, चाकूहल्ला
अन् हत्या
वांद्र्याला मुंबई उपनगराची राणी असं
म्हटलं जातं. याच ठिकाणी मागच्या वर्षभराच्या काळात कलाकार आणि राजकारण्यांशी
संबंधित तीन हाय-प्रोफाइल गुन्हे घडले आहेत. यात गोळीबार, चाकूहल्ला आणि अगदी हत्येचाही समावेश आहे. सैफ अली खानवरील
चाकूहल्ल्याची घटना ताजीच आहे. त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात
दसऱ्याच्या दिवशी माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व परिसरात मुलगा
झीशान सिद्दिकीच्या कार्यालयाबाहेर भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली
होती. त्याआधी एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या वांद्रे पश्चिम इथल्या
‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटबाहेर अज्ञातांनी गोळीबार
केला होता. या घटनांमुळे सेलिब्रिटींसह वांद्र्यातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
या सर्व घटना वांद्र्यात राहणाऱ्या रहिवाशांसाठी मग ते श्रीमंत असो, प्रसिद्ध सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो.. या सर्वांच्याच
सुरक्षेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. काही जण कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची
मागणी करत आहेत, तर काही जण पोलिसांच्या कारवाईची प्रतीक्षा करत आहेत.
वांद्र्यातील सेलिब्रिटींची घरं-
·
सलमान खान- गॅलेक्सी अपार्टमेंट
·
शाहरुख खान- मन्नत
·
आमिर खान- बेला विस्टा अपार्टमेंट
·
रणबीर कपूर- कृष्णा राज
·
आलिया भट्ट- वास्तू
·
संजय दत्त- इंपिरिअल हाइट्स
·
रेखा- सी स्प्रिंग्स
·
झीनत अमान- झीनल विला
·
अनन्या पांडे- पांडे हाऊस
·
फरहान अख्तर- विपासना
·
सायरा बानो- दिलीप कुमार रेसिडेन्स
·
मलायका अरोरा- 81 ओरिएंट
सेलिब्रिटींच्या मनात असुरक्षिततेची
भावना
“एक काळ असा होता, जेव्हा पोलीस मुंबईतील आणि विशेषत:
वांद्र्याच्या प्रत्येक रस्त्यांवर गस्त घालायचे. अलीकडच्या काळात ही गोष्ट
दुर्मिळ झाली आहे,” अशी तक्रार अभिनेत्री पूजा भट्टने सोशल
मीडियावरील पोस्टद्वारे केली. ‘स्थानिक पोलीस हे आमचे पहिले रक्षक
आहेत. सरकार आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचं कर्तव्य आहे की त्यांनी
असं वातावरण निर्माण करावं ज्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुन्हा करण्यास
धजावणार नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांनी शहरात अलिकडच्या काळात झालेल्या असंख्य
गुन्ह्यांवर उत्तरं आणि उपाय देण्याची वेळ आली आहे. जर आपले रस्ते आणि घरं
सुरक्षित नसतील तर टॉवर, आलिशान अपार्टमेंट्स यांसारख्या
बांधकामांच्या उन्मादात अडकून पडण्यात काही अर्थ नाही’, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केलाय.
बाबा सिद्दिकी, सलमान खान आणि त्यानंतर आता सैफ अली खान यांच्यावरील अलिकडच्या काळात
झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ देत माजी खासदार प्रिया दत्त एका मुलाखतीत म्हणाल्या, “आपण नव्वदच्या दशकात परतलोय असं मला वाटतंय. मुंबई हे सर्वांत
सुरक्षित शहरांपैकी एक मानलं जात असे आणि वांद्रे हे एका लहान समुदायासारखं होतं.
पण आता लोकांच्या अनियंत्रित गर्दीमुळे सुरक्षिततेची ही भावनाच आपण गमावली आहे.
विकासाच्या बदल्यात आपण ही किंमत मोजतोय असं वाटतंय.”
नव्वदच्या दशकात सैफसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री
रवीना टंडननेही वांद्रे परिसरात सेलिब्रिटींवरील वाढत्या हल्ल्यांचा निषेध केला. “एकेकाळी सुरक्षित वाटणाऱ्या या भागात सेलिब्रिटींना लक्ष्य करणं आता
सर्रासपणे सुरू झालं आहे. अपघातांचे घोटाळे, फेरीवाले माफिया, अतिक्रमण करणारे, जमीन हडप करणारे आणि दुचाकींवरून फोन, सोनसाखळी चोरणारे यांमुळे वांद्र्यांत प्रचंड असुरक्षितता वाढली आहे.
यावर अधिक कडक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे”, असं रवीनाने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर
लिहिलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
प्रतिक्रिया-
सैफ अली खानवर झालेल्या चाकूहल्ल्यानंतर
मुंबई आणि विशेषत: वांद्रे परिसर सुरक्षित नसल्याच्या प्रतिक्रिया समोर येत
होत्या. त्यावर बोलताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशातल्या मेगासिटीमध्ये सर्वांत सुरक्षित मुंबई आहे. हे खरंय की
कधीकधी काही घटना घडतात. त्याला गंभीरतेनं देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या
घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं योग्य नाही. याने मुंबईची प्रतिमा खराब
होते. पण ते अधिक सुरक्षित राहावं यासाठी निश्चित सरकार प्रयत्न करेल.”
वांद्रे परिसरात हाय-प्रोफाइल लोकांची
मोठी गुंतवणूक
हाय-प्रोफाइल खरेदीदारांसाठी वांद्रे हे
एक प्रमुख ठिकाण आहेत. यामागचं कारण म्हणजे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स
(बीकेसी), वरळी आणि अंधेरीसारख्या प्रमुख व्यावसायिक क्षेत्रांच्या जवळ आहे.
कनेक्टिव्हिटी आणि आलिशान राहणीमान या दोन्ही गोष्टींमुळे सेलिब्रिटी वांद्रे या
परिसराची निवड करतात. याठिकाणी त्यांना अनेक उच्च दर्जाच्या सुविधाही उपलब्ध आहेत.
रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, केएल राहुल, पृथ्वीराज सुकुमारन, तृप्ती डिमरी आणि अथिया शेट्टी
यांसारख्या सेलिब्रिटींनीही वांद्र्यात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
“सैफ अली खानवरील हल्ल्याचा प्रकार मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था
किती ढासळली आहे, याचं लक्ष्य आहे. राज्य शासनाने विशेषत:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असल्याने त्यांनी या गोष्टींकडे
गांभीर्याने पहावं”, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अभिनेत्यावरील खुनी
हल्ल्यामुळे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. भाजप
युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांनी केली. “महाराष्ट्रातत कायदा-सुव्यवस्था उरलेली
नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा
सुव्यवस्था वाऱ्यावर आहे,” असं शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय
राऊत म्हणाले.
चित्रपटसृष्टीतील कलाकार हल्लेखोर, खंडणीखोरांचे लक्ष्य?
हल्लेखोराने एक कोटी रुपयांची खंडणी
मागत सैफवर हल्ला केला. याआधीही चित्रपटसृष्टीतील कलाकार, अभिनेते हे हल्ल्खोर आणि खंडणीखोरांच्या निशाण्यावर असल्याचं दिसून
आलं. यापूर्वी अशा अनेक घटनांची नोंद झाली.
·
सलमान खान– सलमानच्या गॅलेक्सी
अपार्टमेंटबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणाच गँगस्टर लॉरेन्स
बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईविरोधात गुन्हा दाखल आहे. बिष्णोईने
सलमानच्या घराबाहेर गोळीबार केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.
·
सुनील पाल– डिसेंबर 2024 मध्ये स्टँडअप कॉमेडियन सुनील पालचं अपहरण झालं होतं.
अपहरणकर्त्यांनी त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली
होती. त्यातले आठ लाख रुपये मिळाल्यानंतर सुनीलला मेरठमधील रस्त्यावर त्यांनी
सोडून दिलं.
·
शाहरुख खान– शाहरुखला अनेकदा
अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या आहेत. गँगस्टर अबु सालेमकडूनही त्याला धमकावण्यात आलं
होतं. सध्या शाहरुखला वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे.
·
प्रिती झिंटा– ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटाच्या वेळी प्रिती झिंटाला खंडणीसाठी धमकावण्यातआ
आल्याचं सांगितलं होतं. धमकी देणाऱ्यांनी तिच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती.
·
निर्माता दिनेश आनंद आणि अजित दिवानी– 14 फेब्रुवारी 2001 रोजी निर्माता दिनेश आनंद
आणि 30 जून 2001 रोजी निर्माता अजित दिवाणी
यांची अबु सालेमने हत्या घडवून आणली होती. अजित दिवाणी हे अभिनेत्री मनिषा
कोईरालाचे माजी सचिवसुद्धा होते.
·
राकेश रोशन– निर्माता आणि दिग्दर्शक
राकेश रोशन यांना खंडणीसाठी अबु सालेमकडून धमक्या आल्या होत्या. त्यानंतर 2000 मध्ये दोन व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावेळी
त्यांच्या हाताला गोळी लागली होती.
सैफला सहा जखमा, दोन गंभीर
गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या
सुमारास सैफवर हल्लेखोराने चाकूने हल्ला केला. सैफला एकूण सहा जखमा झाल्या असून
त्यातील दोन गंभीर स्वरुपाच्या आहेत. त्याच्या पाठीवर आणि एक मणक्याजवळ असलेली जखम
गंभीर आहे. त्याच्या मानेवर एक किरकोळ जखम आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात
शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
0 Response to "बॉलिवूडशी कनेक्शन असलेल्या वांद्र्याची आज ही अवस्था, कुठे नेऊन ठेवलाय वांद्रे आमचा?"
टिप्पणी पोस्ट करा