
रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ...
महाराष्ट्र,मुंबई : सध्या राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची जणू लाटच आली आहे. जातीय, धार्मिक ध्रुवीकरणासाठी अशी विधानं कमी होती की काय म्हणून आता काही नेत्यांनी त्यात अजून भर घातली आहे. बोलताना अनेक नेत्यांची जीभ घसरल्याचे अनेकदा पाहतो. अशाच एका वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार अडचणीत आले आहेत.
राज्यात निवडणुकीला रंग चढला आहे. प्रचाराच्या तोफा आता
थोड्याच दिवसात थंडावतील. त्यापूर्वी आमदार, नेते आणि कार्यकर्ते
गावोगावी जाऊन प्रचार करत आहेत. राज्यात बड्या नेत्यांच्या सभांना तुफान गर्दी होत
आहे. त्यांची वक्तव्ये आणि विधानांमुळे कुठे गौप्यस्फोट होत आहे तर कुठे एकमेकांवर
चिखलफेक करण्यात येत आहे. एकंदरीतच राजकीय वातावरण तापले आहे. पण सभा, मेळावे, कोपरा बैठक घेताना काही
नेत्यांचा संयम सुटत असल्याचे दिसते. त्यांची जीभ घसरल्याने ऐन प्रचारात वाद
ओढावून घेण्याची नामुष्की काही नेत्यांवर आली आहे. काही जण कृतीतून वादात ओढावून
घेत आहेत. तर काही नेते जीभेवर ताबा नसल्याने वादात अडकले आहेत.
आमदाराच्या वक्तव्याने वाद
नांदेड जिल्ह्यातील किनवटचे भाजपा आमदार
भीमराव केराम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या मतदारसंघातील बोधडी
येथे ते प्रचारसभेसाठी गेले होते. सायंकाळी या गावात त्यांची प्रचार सभा होती.
त्यावेळी त्यांनी भाषणात रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? असा सवाल केला. त्यामुळे सभास्थळी एकच खळबळ उडाली. आमदार महोदयांनी
असं वक्तव्य का केलं याचा उलगडा थोड्याच वेळात झाला. अनेकांनी आमदारांच्या
वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. नेते एकदा निवडून आल्यावर फिरून मतदारसंघात
येत नसल्याचा सूर तरुणांनी आळवला.
तरुणांवरची नाराजी भोवली
सायंकाळची सभा होण्यापूर्वी गावातील काही तरुणांनी निवडणुकीच्या
वेळीच यांचे दर्शन होत असल्याचा चिमटा काढला होता. तर काहींनी तुम्ही गावात येत
नसल्याची नाराजी व्यक्त केली होती. या तरुणांवर नाराजी व्यक्त करण्याच्या नादात
केराम यांचा तोल सुटला. त्यांनी भाषणात रोज गावात येऊन काय तुमचे मुके घ्यायचे का? असा सवाल केला. मंत्रालयात निधी मिळवण्यासाठी फिरावे लागते.
त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तेव्हा कुठे गावाच्या विकासाला निधी मिळतो अशी
सारवासारव त्यांनी लागलीच केली. यावेळी सभा स्थानी माजी मंत्री पंकजा मुंडे या
सुद्धा होत्या. याप्रकारामुळे आमदारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
0 Response to "रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे का? भाजपा आमदारांच्या वक्तव्याने एकच खळबळ... "
टिप्पणी पोस्ट करा