
तूर्तास आमच्याविरोधात लढलेल्यांना महायुतीत नो एन्ट्री; चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान...
महाराष्ट्र : 'श्रद्धा आणि सबुरी' हा मंत्र साईबाबांनी दिला. त्याच मंत्रानुसार भाजप कार्यकर्ते काम करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपची श्रध्दा आणि सबुरी पाहिली आहे. श्रध्दा -सबुरीवर ज्यांनी विश्वास ठेवला ते विजयाकडे गेले आहेत. अमितभाईंनी २०२९ बद्दल वक्तव्य केलं होते. पण राज्यातील सर्व निवडणुकांत महायुतीला पुढे न्यायचं आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात मिळालेल्या महाविजयानंतर शिर्डीत रविवारपासून
भाजपाचे दोन दिवसीय अधिवेशन भरणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे महायुतीला बहुमत
दिले. २३७ आमदाराचे सरकार महाराष्ट्राने निवडून दिले. त्याबद्दल जनतेचे आणि
कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन भरविण्यात आले आहे. पुण्याच्या
बालेवाडी अधिवेशनात विधानसभेची तयारी केली होती. उद्याच्या शिर्डीतील अधिवेशनात
जनतेचे आभार मानण्याबरोबर महाराष्ट्र भाजपाची सदस्य संख्या १.५
कोटी करण्याचा संकल्प मांडला जाणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे यांनी म्हटले आहे.
शिर्डीतील भाजपाच्या या अधिवेशनाची सुरुवात उद्या रविवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. तर समारोप अमित शाह करतील. नितीन गडकरी
पहिल्या सत्राचे समापन करतील. पुण्यातील बालेवाडीच्या अधिवेशनात महाविजयाचा संकल्प
केला होता. आता विजयानंतर जनतेचे आभार मानत आहोत, तसेच महाराष्ट्र भाजपाची दीड कोटी सदस्य
संख्या असावी असा संकल्प आपण केला आहे. १ लाख बुथ अध्यक्ष समिती असावी, प्रत्येक तालुक्यात आमचा अध्यक्ष असावा आणि ही समिती फेब्रुवारी
महिन्यापर्यंत गठीत व्हावी असा प्रयत्न आहे. ६९ जिल्हाध्यक्ष आणि मुंबई धरुन ७६
जिल्हाध्यक्ष हे फेब्रुवारीपर्यंत निवडले जातील. बुथ, तालुका आणि जिल्हाध्यक्ष निवडल्यानंतर प्रदेश अध्यक्ष निवडले जातील
असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार जे निर्णय घेते, ते संघटनेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावे हा या अधिवेशनाचा भाग
आहे. निवडणूक पूर्वी वचननामा दिला होता. त्याच्या पूर्तीसाठी देवेंद्र फडणवीस
निर्णय घेतील. तसेच या निर्णयांचा समाजाला फायदा व्हावा म्हणून संघटना काम करेल.
भाजपच्या या अधिवेशनात १५ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. हे अधिवेशन सर्वात
जास्त प्रतिनिधींचे अधिवेशन ठरणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि इथली टीम आम्हाला
मदत करीत आहे. आशिष शेलार उद्या जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतील, तर भारती पवार हा प्रस्ताव पारित करतील असेही बावणकुळे यांनी
सांगितले.
तुर्तास विरोधात लढलेल्यांना पक्षात घेऊ
नये !
उध्दव शिवसेनेने 2019 ला ब्लंडर युती केली होती. ते त्यांना आता कळाले आहे. त्यांनी भारतीय
जनता पार्टी आणि फडणवीसांना बाजूला करून जी युती केली. त्यांच्या रॅलीत
पाकिस्तानचे झेंडे पोहचत होते, बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी
तिलांजली दिली जात होती. या चुका त्यांना कळाल्यात, कॉंग्रेसच्या विचारांवर चालून उध्दव
ठाकरेंची शिवसेना पुढे जाऊ शकत नाही. परंतू महाराष्ट्रात महायुतीच आहे. आम्ही
विजयातून कोणताही उन्माद आणणार नाही. महायुतीला तडा जाईल असं करणार नाही.
आमच्यातून स्वतंत्र लढलेल्यांना आम्ही पक्षातून काढलं आहे. तुर्तास कुठल्याही
पध्दतीने आमच्या विरोधात लढलेल्यांना पक्षात घेऊ नये असे ठरलंय. भविष्यात आम्ही
तीन नेत्यांचा विचार घेऊन पुढे जाऊ असेही चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.विरोधकांकडे
विकासाचे काही मुद्दे असतील तर फडणवीसजी त्यांना भेटतील. देवेंद्रजींनी सांगितलंय
की ज्यांना विकासावर एकत्र यायचं त्यांनी चर्चेला आलं पाहिजे असेही ते यावेळी
म्हणाले.
0 Response to "तूर्तास आमच्याविरोधात लढलेल्यांना महायुतीत नो एन्ट्री; चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान... "
टिप्पणी पोस्ट करा